बेळगाव : वीज वितरण क्षेत्रातील प्रस्तावित खाजगीकरणाचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, या मागणीसाठी शेतकरी आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांमार्फत राज्य सरकारला निवेदन सादर केले. सरकारने निर्णयाचा पुनर्विचार न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या अन्नसुरक्षेसाठी रात्रंदिवस मेहनत करणारा शेतकरी आधीच अनेक आर्थिक व नैसर्गिक संकटांचा सामना करत आहे. शेतीमालाला वैज्ञानिक पद्धतीने हमीभाव मिळत नसतानाही शेतकरी देशाच्या अन्नउत्पादनात महत्त्वाचे योगदान देत आहे. अशा परिस्थितीत वीज वितरण क्षेत्राचे खाजगीकरण झाल्यास शेतीसाठी आवश्यक असलेल्या वीजपुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
वीज वितरण व्यवस्था सरकारच्या नियंत्रणाखालीच राहणे हे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि ग्रामीण भागाच्या हिताचे असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे. खाजगीकरणामुळे वीजदर वाढण्याची, सेवा अधिक खर्चिक होण्याची तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांच्या सुविधांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे.
सरकारने जनहित आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून वीज क्षेत्रातील खाजगीकरणाचा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा, अन्यथा व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा शेतकरी आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला.
Belgaum Varta Belgaum Varta