जिल्हा परिषद प्रारुप रचनेचा वाद पोहोचला थेट ईडीच्या दारी!
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारुप निश्चित झाल्यानंतर वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. आता हा वाद थेट ईडीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात प्रभाग निश्चित करताना अनेक गावांची तोडफोड ’लक्ष्मी’ दर्शनाने झाल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून ईडीकडे तक्रार करण्यासाठी एक शिष्टमंडळ मुंबईला पोहोचण्याची शक्यता आहे.
प्रभाग निश्चितीवरून आमदार प्रकाश आवाडे यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी प्रारूप जाहीर होण्यापूर्वीच नकाशे तसेच गावांची रचना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा आरोप केला होता. अनेक गावांनी सुद्धा गावसभांमध्ये प्रारूप रचनेला कडाडून विरोध केला आहे. या संदर्भात गावसभेत ठराव करून जिल्हाधिकारी तसेच निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येत आहे. हातकणंगले तालुक्यात 26 तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्रारी दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे.
प्रारुप रचनेवरून अधिकारी रडारवर आले असून त्यांच्या अलीकडील काळातील व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी सुद्धा करण्यात येणार आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीसाठी मतदारसंघ रचना करताना भौगोलिक सलगतेचा विचार झाला नाही. राजकीय दबावातून अधिकार्यांनी गावांची तोडफोड केल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर आता मतदारसंघ बचाव कृती समिती स्थापन करण्याचाही विचार होत आहे.
चंद्रदीप नरके यांचीही प्रारुप रचनेवर टीका
जिल्हा परिषदेच्या 76 आणि पंचायत समितीच्या 152 गणांची प्रभाग रचना काल जाहीर झाल्याने वादाला तोंड फुटले आहे. प्रभाग रचना वादाच्या भोवर्यात सापडली आहे. भौगोलिक संलग्नता टाळून राजकीय दबावाखाली चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना केल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सुद्धा केला होता.
दरम्यान, नव्याने जाहीर झालेली प्रारुप रचना जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार कार्यालय तसेच ग्रामपंचायत आदी ठिकाणी पाहता येणार आहे. 2 ते 8 जून या कालावधीत हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. 21 जूनपर्यंत आलेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन त्या पूर्ण केल्या जातील. याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्तांना 22 जुनला सादर करण्यात आला आहे. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर 27 जुनला अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल.
