बियाण्यांचे वाटप सुरू झाल्याने पावसाची प्रतीक्षा
निपाणी (वार्ता) : यंदा २५ मे पासून रोहिणी नक्षत्रला सुरुवात झाली आहे . त्या पार्श्वभूमीवर निपाणी भागातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी शेती सज्ज केली आहे. सध्या राजधानीतील राजकारणाबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगरपालिका, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळीसह कार्यकर्त्यांचे लक्ष राजकीय घडामोडी कडे लागले आहे. तर बियाण्यांचा पुरवठा सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे लक्ष पावसासाठी आभाळाकडे लागले आहे.
शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून बियाणे, खते आणि औषधांची जुळवाजुळव करण्यासाठी बळीराजाची धावपळ सुरू झाली आहे. उन्हाचा तडाखा कायम असतानाच रोहिणी नक्षत्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रोहिणी नक्षत्रा पाऊस पडला तर खरीप हंगाम चांगला जातो, अशी शेतकऱ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. नांगरणी सऱ्या सोडणीच्या कामासह शेणखत टाकून झाले आहे. आता फक्त पावसासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. पाऊस वेळेवर झाल्यास सोयाबीन, मूग, उडीद पिकाची पेरणी करणे सोपे होणार आहे.
दुसरीकडे राजधानी बेंगलोर येथे मुख्यमंत्री निवडण्याचे प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर नेते मंडळी कार्यकर्त्यांमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री बदलानंतर अनेक खात्याच्या मंत्रिमंडळातही बदल होण्याच्या शक्यतेवर शहरासह ग्रामीण भागात चर्चेला उधाण आले आहे. एकंदरीत शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असून दुसरीकडे सर्वत्र राजकीय चर्चा रंगल्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta