रयत संघटनेची मागणी : खांद्यावर नांगर घेऊन विधानसौधपर्यंत पदयात्रा
निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊस, सोयाबीन, कापसासह इतर पिकांना खर्चाच्या तुलनेत दर द्यावे, या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे यरगट्टी येथून रविवारी (ता.३) खांद्यावर नांगर घेऊन पदाधिकारी व कार्यकर्ते पदयात्रेने विधानसौधला धडक देण्यासाठी रवाना झाले. मात्र पोलिसांनी केवळ दहा कार्यकर्ते व शेतकऱ्यांना या पदयात्रेत परवानगी दिली आहे.
या पदयात्रेचा प्रारंभ कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते झाला. यावेळी पोवार म्हणाले, सोमवारपासून बेळगाव येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन रयत संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी व शेतकरी जाणार आहेत. पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत चर्चा करून मागण्या मान्य झाल्यास आंदोलन स्थगित केले जाणार आहे. अन्यथा गुरुवारी (ता.७) सकाळी बेळगाव येथील कित्तुर चन्नम्मा सर्कल मधून ११ वाजता पदयात्रेने विधानसभेला घेरावा घालण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी चुन्नाप्पा पुजारी, प्रकाश नाईक, सोमू रायणावर, भरमाप्पा रेड्डी, चिदंबर कट्टीमनी, सुरेश परगन्नावर, किसन नंदी, रंगाप्पा गंगरेड्डी, शिवानंद करगन्नावर, महादेव यड्रावी, संजयकुमार नवलगुंदी, इम्तियाज कादरी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते.