वृषाली कांबळे; विविध संघटनातर्फे गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : दहावी, बारावी नंतरच आपले ध्येय ठरविण्याची योग्य वेळ असते. विद्यार्थ्यांनी आपली आवड आणि कौशल्य शिक्षक, पालक आणि पुस्तके यांच्या मदतीने ओळखून आपले ध्येय ठरविणे महत्त्वाचे आहे. अभ्यासातील सातत्य, शिस्त व परिश्रम करण्याची तयारी ठेवल्यास यश नक्की मिळते, असे मतआयएएस वृषाली कांबळे यांनी व्यक्त केले. त्या छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त निपाणी तालुका विविध आंबेडकरी संघटना व एससी एसटी शिक्षक संघातर्फे एससी एसटी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रा. जे. डी. कांबळे होते.
वृषाली कांबळे म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर न करता त्यामधून आपल्या अभ्यासासाठी पूरक गोष्टी कोणत्या आहेत, याकडे लक्ष देऊन मोबाईलचा गरजेपुरता वापर करावा. ग्रामीण भागात इंग्रजीची भीती असते. पण यूपीएससी लेखी परीक्षेसाठी इंग्रजी विषय अनिवार्य नसतो. भाषा कोणतीही चालते. मुलाखतीही कन्नड, मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा कोणत्याही भाषेमध्ये देऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मनामध्ये इंग्रजीची भिती न बाळगण्याचे आवाहन केले.
प्रा. जे. डी. कांबळे म्हणाले, समाजातील शिक्षित वर्गाची भूमिका महत्त्वाचे आहे. मुलांना शिक्षण, संस्कार आणि प्रेरणा देणारी कुटुंब संस्था ही गरजेची आहे. पालकांनी मुलांना शाळेत घातले, त्यांची फी भरली, म्हणजे आपली जबाबदारी झाली असे होत नाही. आपली मुले आपल्यापेक्षा सरस झाली पाहिजेत. असे प्रत्येक पालकांना वाटले पाहिजे. त्यासाठी समाजात मुलांना शैक्षणिक वातावरण निर्माण करून देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
क्षेत्र शिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी, विद्यार्थी दशेत ध्येय, जिद्द आणि परिश्रम आणि वेळेचे महत्त्व पटवून दिले. बाबासाहेबांचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन केले.
विशेष प्राविण्य मिळवलेले सपना शितोळे, आदित्य माने यांनी मनोगत व्यक्त केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र, फाईल, रोख रक्कम श देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक संयोजक समिती यांच्यासह शिक्षक पालक उपस्थित होते. एस. व्ही. तराळ यांनी प्रास्ताविक, बापू शितोळे यांनी सूत्रसंचालन केले. महेश धम्मरक्षित यांनी आभार मनाले.