

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील बस स्थानक परिसरातील धर्मवीर संभाजीराजे चौकातील वाहतूक सिग्नल अनेक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढत चालली आहे. तात्काळ नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी दखल घेऊन वेळेनुसार सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन माजी नगरसेवक ॲड. संजय चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते दीपक सावंत यांच्यासह नागरिकांनी नगरपालिकेला दिले.
निवेदनातील माहिती अशी, नगरपालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून काही वर्षांपूर्वी धर्मवीर संभाजी चौकात वाहतूक सिग्नलची निर्मिती केली. सिग्नल बंद चालूचे टाइमिंग जमत नसल्याने नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी सिग्नल बंद केले आहे. त्यामुळे दररोज वाहतुकीच्या कोंडीची समस्या निर्माण होत आहे. याशिवाय पादचारी व विद्यार्थ्यांना रस्त्यावरून ये -जा करणे कठीण झाले आहे. तरी पालिका आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ या गंभीर व्यवस्थेची पाहणी करून वाहतूक सिग्नल सुरू करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनावर ॲड. संजय चव्हाण, दीपक सावंत, गजानन खापे, संतोष सुर्वे, उमेश सोनाळकर, अशोक खांडेकर, सद्दाम पटेल, योगेश घाटगे यांच्यासह नागरिकांच्या सह्या आहेत.


Belgaum Varta Belgaum Varta