
पिराने पिर दस्तगीर साहेबांच्या उरुसाला अवघे २० दिवस; नगरपालिका प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्ती करावी
निपाणी (वार्ता) : निपाणी शहराचे ग्रामदैवत आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत पिराने पिर दस्तगीर साहेबांच्या उरुसाला २२ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. उरुसाला अवघे २० दिवस शिल्लक असतानाही शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, सर्वत्र खड्डे आणि गटारींचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिक, वाहनधारक आणि भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, काही ठिकाणी सीडी वर्कला भगदाड पडले आहे. पावसामुळे रस्त्यांची अवस्था आणखी बिकट झाली आहे. उरुसाच्या काळात मोठ्या संख्येने भाविक निपाणी शहरात दाखल होणार असल्याने रस्ते, पाणी, गटारी आणि स्वच्छतेच्या सुविधा सक्षम असणे आवश्यक आहे. मात्र, उरुस तोंडावर आला असतानाही नगरपालिका प्रशासनाकडून अद्याप ठोस तयारी झालेली दिसत नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
गतवर्षी उरुसाला आलेल्या भाविकांना, विशेषतः दंडवत घालणाऱ्या भाविकांना रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला होता. यंदा तरी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करून भाविकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी होत आहे.
विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून दर्गा परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांची अवस्था अत्यंत गंभीर झाली आहे. त्यामुळे या मार्गाची तातडीने डागडुजी करण्याची गरज आहे.
उरुसाच्या पार्श्वभूमीवर कोणताही श्रेयवाद न करता सर्वांनी एकत्र येऊन नगरपालिका प्रशासनाला जाब विचारणे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नगरपालिका आयुक्त तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने शहरातील रस्ते, सीडी वर्क, गटारी आणि इतर मूलभूत सुविधांची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे सुरू करावीत, अशी मागणी माजी नगरसेवक मज्जिद सय्यद यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta