बेळगाव : भाजपने काल राज्यसभेच्या तीन जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. आता 13 जून रोजी होणार्या विधान परिषद निवडणुकीत भाजप सर्व चार जागा जिंकेल, असा विश्वास मंत्री गोविंद कारजोळ यांनी व्यक्त केला.
बेळगावमध्ये शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, अत्यंत उत्साहाने पदवीधर आणि शिक्षक मतदार भाजपला पाठिंबा देत आहेत. देशभरात भाजपची सत्ता असावी, अशी देशातील बुद्धीवंतांची अपेक्षा आहे. देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री बोम्मई यांच्या प्रशासनाला अतिशय प्रेमाने आणि विश्वासाने आम्हाला ते पाठिंबा देत आहेत. आम्ही चारपैकी चार जागा जिंकू. हनुमंत निरानी आणि अरुण शहापूर प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास कारजोळ यांनी व्यक्त केला.
अरुण शहापूर यांनी काय काम केले या काँग्रेसचे आमदार आयवन डिसोझा यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री कारजोळ म्हणाले, अरुण शहापूर यांनी काय काम केलेय हे जनतेला माहित आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी काय काम केलेय हेसुद्धा जनतेला माहित आहे. राज्यात माजी मख्यमंत्री येडियुरप्पा, बोम्मई यांनी काय काम केलेय हेसुद्धा सगळ्यांना माहित आहे. हताश होऊन काँग्रेस नेते करीत असलेल्या विधानांकडे लक्ष देण्याची गरज नाही असे, ते म्हणाले.
