कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय
बंगळूर : मंगळुरू येथील एका लॉजमध्ये शुक्रवारी सकाळी एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली.
म्हैसूरमधील विजयनगर येथील देवेंद्र (वय ४६), त्यांची पत्नी आणि अनुक्रमे १४ आणि १० वर्षांच्या दोन मुलींचा आत्महत्या केलेल्यांमध्ये समावेश आहे.
देवेंद्रने कथितरित्या मंगळुरमधील के. एस. राव रोडवरील करुणा रेसिडेन्सी येथील लॉज रूममध्ये गळफास लावून घेतला.
कुटुंबाने तीन दिवसांपूर्वी हॉटेलचे बुकिंग केले होते. सुरुवातीला त्यांनी एक दिवस मुक्काम करण्याचे ठरवले होते, परंतु नंतर मुक्काम आणखी दोन दिवस वाढवला.
मंगळूर शहराचे पोलिस आयुक्त कुलदीप कुमार आर जैन यांनी सांगितले की, देवेंद्रचा मृत्यू आत्महत्येने झाला, परंतु त्यांची पत्नी आणि मुलांचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.
ते म्हणाले, “आम्ही पोस्टमार्टम अहवालाची वाट पाहत आहोत. सुसाईड नोटमध्ये देवेंद्रने आपल्याला आर्थिक समस्या असून कर्ज घेतल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.
मंड्यात जोडप्याची आत्महत्या
मंड्यातील एका वेगळ्या प्रकरणात, श्रीरंगपट्टण तालुक्यातील के. शेट्टीहळ्ळी येथे कौटुंबिक वादातून एका जोडप्याने आत्महत्या केली. के.शेट्टीहळ्ळी येथील पुरुषोत्तम (वय ४५) आणि विद्या (वय ३२) या जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. कौटुंबिक कलहाला कंटाळून पुरुषोत्तम आणि विद्या यांनी गळफास लावून आत्महत्या केली.
पती कामावर गेला असता पत्नीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. पतीने घरी येऊन घराशेजारील शेतात जाऊन गळफास लावून घेतला. मृत पुरुषोत्तम हे म्हैसूर येथील एका खासगी कंपनीत कामाला होते. मृत दाम्पत्याला ७ आणि ५ वर्षांची दोन मुले आहेत. आई-वडील गमावल्याने ही मुले अनाथ आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. मृतदेह शासकीय रुग्णालयाच्या शवागारात हलवण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीरंगपट्टण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta