बेळगाव : आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर आणि केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस भवन येथे मोठ्या प्रमाणात आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून मंत्री के. एस. ईश्वरप्पा हे कंत्राटदाराच्या मृत्यूला जबाबदार असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी हेब्बाळकर आणि जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवनपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला होता. यावेळी कंत्राटदाराला न्याय मिळालाच पाहिजे तसेच त्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजप सरकारमध्ये ना खाऊंगा ना किसको खाने दुंगा अशी सातत्याने घोषणा देतात. मात्र त्यांच्याच भाजप सरकारमध्ये अनेक मंत्री 40 टक्के कमिशन कंत्राटदाराकडे मागत असल्याचे समोर आले आहे. याबाबत स्वतः कंत्राटदाराने माझ्या मृत्यूला मंत्री ईश्वरप्पा जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच मृत संतोष हा याने देखील मरणापूर्वी यासंदर्भात चिट्ठी देखील लिहिली आहे. त्यामुळे निष्पाप कंत्राटदाराने भाजप मंत्राच्या या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी. आणि मृताला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.