
बेळगाव : बेळगावमध्ये सुरू असलेल्या रस्ते विकास कामांच्या धीम्या गतीमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. खोदलेले रस्ते दुरुस्त करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने, अखेर वाहतूक पोलिसांनीच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे.
बेळगाव शहराच्या विविध भागांत विकासाच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. मात्र, ही कामे पूर्ण करण्याची गती अत्यंत संथ असल्याने वाहनधारकांना धुळीचा आणि वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी कामे अर्धवट स्थितीत असल्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

प्रशासकीय यंत्रणेच्या या उदासीनतेचा प्रत्यय मंगळवारी शनिवारी मंदिर परिसरात आला. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे पाहून, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची वाट न पाहता वाहतूक पोलिसांनी स्वतः कुदळ-फावडी हाती घेतली. पोलिसांनी आपल्या स्तरावर माती टाकून रस्ता समतल केल्याने वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पोलिसांच्या या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत असले तरी, जबाबदार विभागांच्या बेजबाबदारपणाबद्दल लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने या कामांना वेग देऊन रस्ते त्वरित सुरळीत करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.
Tags:
Belgaum Varta Belgaum Varta