रायबाग : रायबाग तालुक्यातील निपनाळ येथे जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत महिलांसह एकूण नऊ जण गंभीर जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, निपनाळ गावातील बिलकारा शेतातील जमिनीच्या वादातून हा संघर्ष उफाळून आला. एका गटाने शेत रिकामे करण्याची धमकी दिल्यानंतर वाद चिघळला. त्यानंतर दगडफेक, काठ्या, तलवारी, लोखंडी रॉड आणि लाठ्यांच्या सहाय्याने हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या हल्ल्यात नागप्पा बिलकारा, सुनंदा, होलेव्वा, रामप्पा, संजू व मारुती बिलकारा यांच्यासह एकूण नऊ जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने गोकाक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, बसवराज मार्डी, विवेकानंद व यमनप्पा यांच्यासह सुमारे आठ जणांवर हल्ल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेची नोंद रायबाग पोलिस ठाण्यात झाली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta