निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरात भटक्या श्वानांचा दिवसेंदिवस उपद्रव वाढत आहे. तरीही पालिका प्रशासनाने कोणतीही उपायोजना केलेली नाही. येथील साईशंकर नगर मधील निहाल तुषार कांबळे (वय ११) मुलाचा भटक्या श्वानाने चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. तात्काळ येथील महात्मा गांधी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करून त्याला घरी पाठवण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, निहाल कांबळे हा आपल्या मित्रा समवेत साईशंकर मध्ये क्रिकेट खेळत होता. त्यावेळी बॉल गटारीत गेल्याने तो आणण्यासाठी गेला होता. याच वेळी परिसरात असलेल्या श्वानांच्या टोळीतील एका श्वानाने त्याचा मांडीसह पाया जवळील पिंडरी व हाताचा चावा घेतला. त्यामुळे घाबरलेल्या निहालने तात्काळ घरी जाऊन ही माहिती सांगितली. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. त्या ठिकाणी प्रथम उपचार करून त्याला घरी पाठविण्यात आले आहे. यापूर्वी याच कांबळे कुटुंबीयातील लहान मुलावरही भटक्या श्वानांचा हल्ला झाला होता. त्यावेळीही पालिका प्रशासनाला कळवूनही त्यांनी दुर्लक्ष केले होते. शहरात दररोज श्वानांच्या हल्ल्यात वाढ होत असताना नगरपालिका प्रशासन मात्र त्यावर कोणतीही उपायोजना केलेली नाही. संबंधित विभागाने भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी तुषार कांबळे यांच्या सह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta