बेळगाव : येळ्ळूर परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू झाली असून भात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. वातावरणात होत असलेल्या बदलामुळे आणि पावसाची चाहूल लागताच शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत.
येळ्ळूर, कंग्राळी, आंबेवाडी आणि परिसरातील गावांमध्ये सकाळपासूनच शेतांमध्ये ट्रॅक्टर, नांगर आणि इतर कृषी अवजारांची वर्दळ दिसून येत आहे. शेतकरी शेत नांगरणी, वखरणी आणि पेरणीपूर्व तयारी करत असून काही ठिकाणी भात रोपवाटिकेची कामेही सुरू झाली आहेत. आता सर्वांचे लक्ष पहिल्या पावसाकडे लागले आहे.
वेळेत आणि समाधानकारक पाऊस झाल्यास यंदा भाताचे उत्पादन चांगले मिळेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. मात्र खत, बियाणे, इंधन यांच्या वाढत्या किमतींसह मजुरांची कमतरता यामुळे शेती खर्च वाढला आहे. तरीही चांगल्या उत्पादनासाठी शेतीकामात कोणतीही कसर ठेवली जाणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
दरम्यान, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सुधारित बियाणे, खत व्यवस्थापन आणि आधुनिक पद्धतीने पेरणीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta