बेळगाव : शहर महाराष्ट्र समितीची रविवारी रंगुबाई पॅलेस येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शहर समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आगामी आंदोलनांची दिशा, सीमाप्रश्न आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या प्रारंभी दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर रणजीत चव्हाण -पाटील यांनी प्रास्ताविकातून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. आगामी १ जून हुतात्मा दिन आणि कन्नड सक्तीविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या नियोजनावर विशेष चर्चा झाली.
कन्नड सक्तीविरोधी मोर्चासाठी शहर, तालुका आणि खानापूर समितीच्या बैठकीनंतर मध्यवर्तीच्या बैठकीत अंतिम तारीख जाहीर करण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी दिली. मराठी भाषिकांच्या प्रश्नांवर समिती अधिक आक्रमकपणे भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिकेत सीमाप्रश्नावर समितीच्या नगरसेवकांनी ठाम भूमिका घेत मराठी भाषिकांचा आवाज बुलंद केल्याबद्दल बैठकीत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सीमालढा अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटित राहून सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही करण्यात आले.
बैठकीत रणजीत हावळाणाचे, मनोहर हलगेकर, सागर पाटील, श्रीकांत कदम, राजू बिरजे, माजी महापौर मालोजी अष्टेकर, रणजीत चव्हाण-पाटील, नितीन खन्नूकर, नगरसेवक रवी साळुंखे, प्रकाश नेसरीकर, मदन बामणे, नारायण मुचंडीकर, राजू पाटील आणि आंबरोळे यांनी मनोगते व्यक्त केली.
बैठकीस समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta