
बेळगाव : जिल्ह्यात वाढत असलेल्या गो-तस्करी आणि गो-हत्येच्या घटनांवर तातडीने नियंत्रण आणून गो-हत्त्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या बेळगाव शाखेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कर्नाटक पशु हत्या प्रतिबंधक आणि संरक्षण कायदा 2020 अस्तित्वात असतानाही जिल्ह्यात काही ठिकाणी गो-हत्येच्या घटना सुरूच आहेत. त्यामुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असून प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच गाईंच्या संरक्षणासाठी शासनाने विशेष निधी उपलब्ध करून गोपालनाला प्रोत्साहन द्यावे, अवैध गो-मांस वाहतूक आणि गाईंच्या बेकायदेशीर तस्करीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. पोलीस, परिवहन आणि संबंधित विभागांनी समन्वय साधून कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
निवेदन सादर करताना स्वामीजींसह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta