
बेळगाव : रास्त भाव धान्य दुकानांवरील सततच्या सर्व्हर समस्येमुळे धान्य वितरणात अडथळे निर्माण होत असल्याच्या निषेधार्थ बेळगाव जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारकडे पाठवण्यात आले.
दुकानदारांनी सांगितले की, महिन्याच्या सुरुवातीपासूनच सर्व्हर संथ गतीने कार्यरत असल्याने लाभार्थ्यांचे अंगठ्याचे ठसे स्वीकारण्यासाठी मोठा वेळ लागत आहे. परिणामी गरीब नागरिकांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत रेशन दुकानांसमोर रांगेत थांबावे लागत असून दुकानदारांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ४० टक्के तांदळाचे वितरण पूर्ण झाले असून उर्वरित ६० टक्के वितरण प्रलंबित असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. त्यातच अन्न व नागरी पुरवठा विभागाने एका व्यक्तीकडून दोनदा अंगठ्याचा ठसा घेण्याचा नियम लागू केल्याने परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाल्याचा आरोप करण्यात आला.
“एकदाच अंगठ्याचा ठसा घेतानाही अनेक अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत दोनदा ठसा घेण्याची सक्ती अन्यायकारक आहे. पुढील महिन्यापासून एकदाच ठसा घेण्याची परवानगी द्यावी आणि सर्व्हरची समस्या कायमस्वरूपी सोडवावी,” अशी मागणी संघटनेचे प्रतिनिधी राजशेखर तळवार यांनी केली.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानदारांचे निवेदन स्वीकारून संबंधित प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. आंदोलनात बेळगाव जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने दुकानदार सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta