
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने तालुक्यातील खत टंचाई आणि विस्कळीत वीज पुरवठ्याच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत तहसीलदार आणि हेस्कॉम प्रशासनाला निवेदन सादर केले आहे.

पेरणीच्या तोंडावर खतांचा तुटवडा
खानापूर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र, डीएपी आणि युरिया खतांचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
निवेदनानुसार, वेळेत खत उपलब्ध न झाल्यास पेरणी खोळंबून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. पुढील दोन ते चार दिवसांत तालुक्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली.
विस्कळीत वीज पुरवठ्यावर संताप
तालुक्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याविरोधात खानापूर समितीने सोमवारी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. सहाय्यक अभियंता प्रवीण बरगाले यांच्या अनुपस्थितीत विभागीय अधिकारी नागेश देवलतकर यांनी निवेदन स्वीकारले.
समितीने अनेक गावांमध्ये केवळ रात्रीच वीज पुरवठा केला जात असल्याचा आरोप केला. त्यामुळे शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा धोका पत्करून रात्रीच्या अंधारात पिकांना पाणी द्यावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच, वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात आली.
निवेदन सादर करताना अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबरराव पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, सरचिटणीस आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण, मारुतीराव परमेकर, अमृत शेलार, रणजित पाटील, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, राजाराम देसाई, धनंजय पाटील, अजित पाटील यांच्यासह समितीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta