Sunday , July 26 2026
Breaking News

‘माझं ध्येय आणि मी’ : शिक्षणातूनच घडेल उद्याची समृद्ध ‘ताराराणी’!

Spread the love

 

खानापूर : विद्यार्थ्यांनी आयुष्यात स्पष्ट ध्येय निश्चित करून सकारात्मक विचार, आत्मविश्वास, शिस्त आणि सातत्याच्या बळावर यश संपादन केले पाहिजे. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपल्यास आजची विद्यार्थिनी भविष्यातील एक सक्षम ‘ताराराणी’ म्हणून घडेल, असे प्रबोधनात्मक व प्रेरणादायी उद्गार यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी (ता. चंदगड) येथील प्रसिद्ध अभ्यासक प्रा. डॉ. मधुकरराव जाधव यांनी काढले. येथील मराठा मंडळ ताराराणी हायस्कूल व महाविद्यालयात शिक्षण महर्षी कै. नाथाजीराव साहेब यांच्या २१ व्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून ‘शिक्षण उपक्रम दिन’ मोठ्या उत्साहात व भावपूर्ण वातावरणात पार पडला. या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परशुरामअण्णा गुरव सर उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शिवाजीराव पाटील सर उपस्थित होते.
या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा. डॉ. मधुकरराव जाधव यांनी “माझे ध्येय आणि माझे मन” तसेच “ताराराणी : काल, आज आणि उद्या” या दोन महत्त्वपूर्ण विषयांवर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. आपल्या ४० मिनिटांच्या घणाघाती भाषणात त्यांनी स्पष्ट केले की, यशाची पायरी चढताना केवळ स्वप्न न पाहता ‘माझं ध्येय आणि मी’ या नात्याची जाणीव ठेवून कठोर परिश्रम व आत्मविश्वासाने पुढे गेले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, वीरमाता जिजाऊ, छत्रपती ताराराणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या काळात नितांत गरज असून आजच्या विद्यार्थिनींनी संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि सक्रिय सहभागाच्या जोरावर ‘उद्याची ताराराणी’ बनून समाजाचे नेतृत्व केले पाहिजे. त्यांच्या या ओघवत्या शैलीतील विचारांनी उपस्थितांमध्ये नवी जिद्द आणि प्रेरणा निर्माण केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेजचे प्राचार्य श्री अरविंद पाटील सर यांनी केले. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कै. नाथाजीराव साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या जीवनकार्यावर व शैक्षणिक योगदानावर सविस्तर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन मराठा मंडळ ताराराणी पी यु कालेजच्या शिक्षिका सुनीता कणबरकर व मंगल देसाई यांनी केले. तर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. राहुल जाधव यांनी प्रथम कै. नाथाजीराव साहेब यांच्या विषयी कृतज्ञतापूर्वक विचार मांडून उपस्थितांचे आभार मानले. या शिक्षण उपक्रम दिनास हायस्कूल व कॉलेजचे प्राध्यापक वर्ग, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

नाथाजीरावांनी शिक्षणातून बहुजनांच्या उत्थानाचे कार्य केले

Spread the love  पत्रकार वासुदेव चौगुले : खानापूर मराठा मंडळ महाविद्यालयात स्मृतिदिनानिमित्त अभिवादन खानापूर : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *