

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी तालुक्यातील सर्व रेशन कार्डधारकांना महत्त्वाचे आवाहन करत ई-केवायसी प्रक्रियेसाठी कोणत्याही रेशन दुकानदाराला एक रुपयाही देऊ नये, असे स्पष्ट केले आहे.
सध्या खानापूर तालुक्यातील सर्व शासकीय रेशन दुकानांमध्ये रेशन कार्डधारकांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया शासनाकडून पूर्णपणे मोफत असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्याचा अधिकार दुकानदारांना नसल्याचे त्यांनी सांगितले.
रेशन कार्डधारकांनी ई-केवायसीच्या नावाखाली कोणत्याही दुकानदाराला पैसे देऊ नयेत. ई-केवायसी न झाल्यास संबंधित रेशन कार्डधारकाचा रेशन कोटा दुकानदाराला मिळत नाही. त्यामुळे दुकानदारांनी कोणतेही शुल्क न घेता सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जर एखादा रेशन दुकानदार ई-केवायसीसाठी पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले, तर संबंधित दुकानदाराचा परवाना (लायसन्स) रद्द करण्याची कारवाई करण्याची शिफारस करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, पैसे देऊन ई-केवायसी करून घेतल्याचे आढळल्यास संबंधित प्रकरणाची चौकशी करून शासनाकडे आवश्यक शिफारस करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
तालुक्यातील नागरिकांनी जागरूक राहून गावात कोणताही रेशन दुकानदार ई-केवायसीसाठी पैसे मागत असल्यास त्याची माहिती गॅरंटी योजनेच्या अध्यक्ष किंवा सदस्यांना तातडीने द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गॅरंटी योजनेच्या वतीने सर्व रेशन कार्डधारकांनी आपल्या हक्काच्या सेवेसाठी कोणतेही शुल्क न भरता मोफत ई-केवायसी करून घ्यावी आणि कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन पंचहमी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta