


खानापूर : खानापूर ते एम. के. हुबळी मार्गावर व्हाया हिरेहट्टीहोळी गावातून सुरू करण्यात आलेल्या नवीन बससेवेचे उद्घाटन खानापूर तालुका गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या बससेवेमुळे हिरेहट्टीहोळी परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
या वेळी बससेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणारे गॅरंटी योजनेचे सदस्य विवेक तडकोड, बसचालक महाबूब पारस आणि वाहक मणियार यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना सूर्यकांत कुलकर्णी म्हणाले की, हिरेहट्टीहोळी
गावातून बससेवा सुरू करण्याची मागणी गॅरंटी योजनेचे सदस्य विवेक तडकोड तसेच गावातील पंचमंडळींकडून गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन आज ही बससेवा सुरू करण्यात आली आहे.
गॅरंटी योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. तालुक्यातील कोणत्याही नागरिकाला विकासकामे किंवा इतर समस्या असल्यास त्यांनी तालुका पंचायत, खानापूर येथील कार्यालयाशी संपर्क साधावा. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण जातीने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
बससेवा सुरू झाल्याने हिरेहट्टीहोळी परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. यावेळी विवेक तडकोड, ग्रामपंचायत पीडीओ राजू तळवार, बाबू देसनूर, अशोक नेमन्नावर, शिवनाप्पा घाडीकोप, बाबू पच्चर, निंगापा होसमनी, कोमल करेन्नावर, निंगापा देवलत्ती यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, पंचमंडळी, महिला, युवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta