बेळगाव : श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्य वाणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील 200 अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले व इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.
गोवावेस येथील चिदंबर पांडुरंग व राजाराम महाराज गुरु मठात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक प्रसाद कपिलेश्वरी उपस्थित होते प्रारंभी महिलांनी स्वागत गीत सादर केले.
यावेळी समाजाचे अध्यक्ष महादेव गावडे यांनी अध्यक्षीय भाषण केले. तर गुरु मठाचे अध्यक्ष समीर अनगोळकर यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे प्रसाद कपिलेश्वरी यांनी विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या गोष्टी आपल्या विचारातून मांडल्या.
त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते समाजातील शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य व शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. यावेळी समाजातील यंदाच्या वर्षी इयत्ता दहावी मध्ये प्रथम द्वितीय व तृतीय तसेच इयत्ता बारावी मधील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला व्यासपीठावर समाजाचे अध्यक्ष महादेव गावडे, सचिव विनायक शहापूरकर, महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा सटवाणी, सेक्रेटरी मंजुषा देवलापूरकर, युवा संघटना उपाध्यक्ष प्रसाद निखार्गे, सचिव रुपेश बापशेठ, शाखा गुरु मठाचे अध्यक्ष समीर अनगोळकर, सचिव विशाल मुरकुंबी, समाजाचे विश्वस्त सुरेश पिळणकर, सुधीर मदली, राकेश कलघटगी, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला समाजातील बांधव, तसेच समाजातील विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा हणमशेठ यांनी केले तर आभार प्रदर्शन मंजुषा देवलापूरकर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री समादेवी संस्थान, महिला मंडळ, युवा संघटना, गुरुमठ यांच्या सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta