

बैलहोंगल : बैलहोंगल शहरात सोमवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. अवघ्या काही मिनिटांत कोसळलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांचे नाल्यांमध्ये रूपांतर झाले, तर अनेक सखल भाग जलमय झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
दुपारी अचानक सुरू झालेल्या मेघगर्जनेसह पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. पावसाच्या प्रचंड वेगामुळे शहरातील अनेक मुख्य रस्ते आणि वसाहतींमध्ये पाणी साचले. काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह इतका वाढला की रस्त्यांवर उभ्या असलेल्या दुचाकी वाहून गेल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली.
हरळय्या कॉलनी परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. घरात साचलेले पाणी बादल्या, भांडी आणि इतर साधनांच्या साहाय्याने बाहेर काढण्यासाठी महिला व कुटुंबीयांची धावपळ सुरू होती.
बसस्थानक परिसरातही पाण्याचा मोठा प्रवाह निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी कसरत करावी लागली.
दरम्यान, तटवटी हिरो शोरूमच्या आवारातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मालमत्तेचे किरकोळ नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
अचानक झालेल्या या मुसळधार पावसामुळे बैलहोंगल शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन काही काळ ठप्प झाले असून प्रशासनाने सखल भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta