बेळगाव : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम रविवार, दि. 28 जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे थेंब पाजणे अनिवार्य असल्याची माहिती शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे प्रधान सचिव ऋत्विक पांडे यांनी दिली.
गेल्या 14 वर्षांपासून भारत पोलिओमुक्त असला तरी जगातील काही भागांमध्ये तसेच भारताच्या शेजारील काही देशांमध्ये जंगली पोलिओ विषाणूचा प्रसार आढळून येत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ही मोहीम राबविण्यात येत आहे.
दि. 28 जून रोजी विविध पोलिओ बूथवर बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे थेंब पाजण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील दोन ते तीन दिवस आरोग्य कर्मचारी लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मुलांचा शोध घेऊन घरोघरी भेट देणार आहेत. स्थलांतरित कुटुंबे, बांधकाम मजूर वस्त्या तसेच झोपडपट्टी भागातील मुलांना या मोहिमेत विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने पालकांना आवाहन केले आहे की, आपल्या पाच वर्षांखालील मुलांना पोलिओ प्रतिबंधक थेंब न चुकता पाजावेत आणि राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला सहकार्य करावे. पोलिओमुक्त भारताचे यश कायम राखण्यासाठी प्रत्येक बालकाचे लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे.
Belgaum Varta Belgaum Varta