बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था (मुंबई), विश्वभारत सेवा समिती (बेळगाव), पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालय (शहापूर) आणि मंथन मराठी साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच पंडित नेहरू महाविद्यालयाच्या आवारात भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल २०० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे शानदार उद्घाटन महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी सौ. धनश्री कंग्राळकर यांच्या हस्ते फलकाच्या अनावरण व स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या मनोगतात त्यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना लेखनाचे महत्त्व पटवून दिले.
याप्रसंगी व्यासपीठावर विश्वभारत सेवा समितीचे उपाध्यक्ष माननीय नेताजीराव कटांबळे, संस्थेचे सचिव प्रकाश नंदिहळी, संस्थेचे संचालक पी. आर. गोरल, बी. पी. गोरल, श्रीकांत चव्हाण, शिवाजी पाटील तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आरती गोरल, भाग्यश्री आलोजी, सुकृती लोहार आणि स्वाती भास्कळ प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या, सर्व प्राध्यापक वर्ग, यांनी विशेष परिश्रम घेतले. या निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक, पालकांनीही मोठी उपस्थिती दर्शवली होती. अतिशय उत्साही आणि स्पर्धात्मक वातावरणात ही निबंध स्पर्धा संपन्न झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मयूर नागेनहट्टी यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta