

बेळगाव : रयत गल्ली परिसरात गेल्या आठ दिवसांपासून सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. कधी कधी रात्री १२ वाजता गेलेली वीज दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत येत नसल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे. वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम असल्याने जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे.
शहापूर तक्रार निवारण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता लँडलाईन तसेच मोबाईलवर “सध्या संपर्क उपलब्ध नाही, थोड्यावेळाने प्रयत्न करा” असा प्रतिसाद मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही वेळा संपर्क झाल्यास कर्मचारी ‘लाईनमन पाठवतो’ असे सांगतात, मात्र संबंधित कर्मचारी उशिरा येऊन तात्पुरती दुरुस्ती करून निघून जात असल्याने काही वेळातच पुन्हा वीजपुरवठा खंडित होत असल्याचे स्थानिकांचे आरोप आहेत.
स्वयंचलित प्रणालीत बिघाड झाल्याने दिवसभरात अनेकदा, कधी कधी प्रत्येक ५ ते १० मिनिटांनी वीज खंडित होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता “सेक्शन ऑफिसरशी संपर्क करा” असे सांगितले जात असल्याने नागरिकांना समाधानकारक तोडगा मिळत नसल्याची तक्रार आहे.
दरम्यान, वीज वितरण कंपनीकडे (Hubballi Electricity Supply Company Limited) वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे घरगुती कामकाज, व्यवसाय तसेच शेतमजूर महिलांच्या शेतीकामावर मोठा परिणाम होत आहे.
वीज बिल वेळेत न भरल्यास दंड आकारला जातो, मात्र वारंवार खंडित होणाऱ्या पुरवठ्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. समस्या तातडीने सोडवली नाही तर रेल्वे स्टेशनजवळील मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta