

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भातील उच्चाधिकार समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज, बुधवार (८ जुलै) रोजी मुंबईतील मंत्रालयाच्या मंत्रिमंडळ सभागृहात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित खटल्यासंदर्भात पुढील वाटचालीच्या दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी होऊन सीमाभागातील मराठी भाषिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर करणार आहेत. सीमा प्रश्नाच्या पुढील वाटचालीसंदर्भात या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा आणि निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी ही बैठक ३० जून रोजी विधानभवनात आयोजित करण्यात आली होती. मात्र, अपरिहार्य प्रशासकीय कारणास्तव ती ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने सीमाभागात नाराजीची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे शासनाच्या भूमिकेबाबतही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
बैठकीत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमा प्रश्नाच्या खटल्याची सद्यस्थिती, महाराष्ट्र सरकारची पुढील कायदेशीर भूमिका, तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांच्या विविध मागण्या आणि समस्यांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय सीमा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याचीही शक्यता असून, या बैठकीकडे संपूर्ण सीमाभागाचे लक्ष लागले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta