

येळ्ळूर : येळ्ळूर येथील चांगळेश्वरीनगर परिसरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था दूर करण्यासाठी अखेर ग्रामपंचायतीच्या वतीने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी ग्रामपंचायत पीडीओ पूनम गडगे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर बुधवारी (दि. ८) रस्त्यावरील खड्डे बुजवून मुरूम व खडी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चांगळेश्वरीनगर परिसरातील मुख्य रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने रस्ता चिखलमय झाला होता. परिणामी नागरिक, शेतकरी, वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत परिसरातील नागरिकांनी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्याकडे तक्रार करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
नागरिकांच्या मागणीची दखल घेत सतीश पाटील यांनी ग्रामपंचायत पीडीओ पूनम गडगे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मुरूम – माती टाकून जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरील खड्डे भरून रस्ता वाहतुकीयोग्य करण्याचे काम सुरू करण्यात आले.
चांगळेश्वरीनगरचा झपाट्याने विस्तार होत असून येथील हा मुख्य रस्ता मच्छे, झाडशापूर तसेच इतर गावांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावरून नागरिकांसह शेतकरी आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक दिवसांपासून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
ग्रामपंचायतीने तातडीने दखल घेत काम सुरू केल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, पीडीओ पूनम गडगे तसेच ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले. उर्वरित रस्त्यावरही लवकरच आणखी मुरूम-माती टाकून दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन सतीश पाटील यांनी दिले.
यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, मनोहर घाडी, यल्लाप्पा बिर्जे, मारुती मजुकर, सुनील घाडी, अजित मजुकर, सदानंद मजुकर, विक्रम कुगजी, गणेश घाडी, वसंत नायकोजी आदी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta