

चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील उमराणी गावात शेतात उगवलेली जंगली आळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील ९ जणांची प्रकृती बिघडल्याची घटना शुक्रवारी घडली. सर्वांवर चिक्कोडी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून एका गर्भवती महिलेला पुढील उपचारांसाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतातील काम आटोपल्यानंतर जिद्दीमणी व कोळी कुटुंबातील सदस्यांनी शेतात उगवलेली जंगली आळंबी गोळा करून घरी शिजवून खाल्ले. त्यानंतर दुसऱ्या एका कुटुंबानेही त्याच शेतातून आळंबी आणून त्याचे सेवन केले.
मात्र, संबंधित शेतातील पिकांवर यापूर्वी कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली होती. आळंबी खाल्ल्यानंतर काही वेळातच संबंधितांना उलट्या, जुलाब आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाला. त्यामुळे स्थानिकांनी तत्काळ सर्वांना चिक्कोडी शासकीय रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, उपचारानंतर सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असून जीवाला कोणताही धोका नाही. मात्र, एका गर्भवती महिलेची प्रकृती लक्षात घेऊन तिला पुढील उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या घटनेनंतर आरोग्य विभागाने नागरिकांना जंगली मशरूमची खात्रीशीर ओळख नसल्यास त्यांचे सेवन टाळावे, तसेच कीटकनाशकांची फवारणी झालेल्या शेतातील वन्य अन्नपदार्थ खाऊ नयेत, असे आवाहन केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta