

बेळगाव : सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला गती मिळावी यासाठी बेळगावच्या मराठी पत्रकार संघ व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जो उपक्रम हाती घेण्यात आला त्यासाठी पुन्हा एकदा पुणे येथील पुणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सह्यांची मोहिम हाती घेण्यात आली. आषाढी एकादशीला सीमासभागतील लाखो वारकरी भाविक पुण्यात येतात या भाविकांना सीमाभागातील पुणे येथे स्थायिक झालेल्या नागरिकांकडून एक दिवस महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यावेळी सीमाभागातील जे नोकरी व्यवसायानिमित्त पुणे येथे स्थायिक झालेले आहेत ते सर्वजण इथे जमतात. याचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक १० जुलै रोजी छोटीशी सभा आयोजित करून सीमाप्रश्न,सर्वोच्च न्यायालयातील खटला व सीमावासियावर होणारे भाषिक अत्याचार यावर चर्चा करून सह्यांची मोहीम राबविण्यात आली.
प्रास्ताविक विश्वानाथ पाखरे यांनी करून या सभेचा उद्देश सांगीतला, यावेळी बोलताना चन्नेवाडी ता.खानापूर येथून या वारकऱ्यांच्या सोबत गेलेल्या रामचंद्र पाटील यांनी मराठी भाषिकावरील अन्यायाचा पाढा वाचतांना मराठीची होणारी गळचेपी तसेच कन्नडसक्ती व मराठी माणसावर दाखल होणाऱ्या खोट्या गुन्ह्याबद्दल माहिती दिली. व पुणेस्थित युवकांनी व नागरिकांनी आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी जो लढा हाती घेतला आहे त्याचे कौतुक केले.
खानापूर,बेळगाव मित्र मंडळाचे संस्थापक पीटर डिसोझा यांनी आपापसातील मतभेद विसरून आपल्या सीमाबांधवांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहून सिमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकारला वेळोवेळी जाग करण्याचं काम आपण करत राहू अशी ग्वाही दिली.
खानापूर बेळगाव मित्रमंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी हा प्रश्न दोन राज्यांचा असून सीमालढ्याच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार कुठंतरी कमी पडतंय की काय असं वाटत असताना उच्याधिकार समितीच्या बैठकीने नव्या वळणावर सीमालढा पोहचला असून निकराची लढाई लढण्याची गरज आहे तर समाज माध्यमावर सीमालढ्याविषयी लिहिताना कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी युवकांनी घेतली पाहिजे,असे आवाहन केले.
उद्योजक मारुती वाणी यांनी मरगळ आलेल्या लढ्याला नवसंजीवनी देण्याचं काम आपण करूया, कुठल्याही राज्य किंवा भाषेविरुद्ध हा लढा नसून आपल्या अस्मितेचा आहे, व प्रत्येक सीमावासीयाने यात सहभागी दर्शवून आपले कर्तव्य बजावावे असे सांगितले.
दत्ता भेकणे, संदीप घाडी,केदार शिवणगेकर व शिवाजी जळगेकर यांनीही या लढ्यासाठी पुढाकार घेतलेल्या पुणेस्थित युवकांचे कौतुक करून मार्गदर्शन केले.
आभार प्रदर्शन सातेरी पाटील, गणपती पाटील यांनी केले. यावेळी लक्ष्मण काकतकर, रामचंद्र निलजकर, अरुण विर, मष्णू देमाणीचे, मारुती पाटील, अर्जुन वीर, वैराळ सुळकर, गंगाराम वीर, प्रशांत गुंजीकर, विनोद वीर, सुधीर शिवणगेकर, शांताराम बडस्कर, सुरेश हलगी, भुजंग पाखरे, यल्लाप्पा केसरेकर, विजय सावंत, विठ्ठल सावंत, राजू सावंत, प्रमोद सावंत, शिवाजी पाटील, बाळकृष्ण गुंडप, शंकर गुरव, पुंडलिक पाटील, अतुल काकतकर, श्रीधर पाटील, नारायण पाटील, लक्ष्मण झुंजवाडकर, संतोष रुपन, सतीश रूपन, प्रल्हाद पाटील, सिद्धू वाकाले, कलाप्पा पाटील, विजय गुरव, ज्ञानेश्वर पाटील, श्रीकांत मिराशी, शांताराम पाटील, माऊली पठाण, नारायण पठाण, राजू शिंदे, रामचंद्र सबनीस, मानतेश मळक, महेश वाकले, महेश अंग्रोळकर, राजकुमार अंग्रोळकर, निवृत्ती मोरे आणि व्यंकप्पा पाटील आदी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta