

बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेशी संबंधित घडलेल्या एका खेदजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते व समाजप्रबोधनकर्ता शाम पाटील यांनी नागरिकांना महाराजांच्या प्रतिमेचा आणि विचारांचा सन्मान राखण्याचे आवाहन केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात शाम पाटील यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत नसून संपूर्ण देशासाठी स्वाभिमान, शौर्य, न्याय, राष्ट्रप्रेम आणि आदर्श नेतृत्वाचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा किंवा अनादर होणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. स्त्रीसन्मान, सर्वधर्मसमभाव, न्यायप्रिय राज्यकारभार आणि राष्ट्रनिष्ठा ही त्यांची शिकवण आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
समाजात जनजागृतीसाठी विविध उपक्रम आणि समाजमाध्यमांवर प्रेरणादायी व्हिडिओ तयार करत असल्याचे सांगत पाटील यांनी एका व्हिडिओचा उल्लेख केला. या व्हिडिओमध्ये काही लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दाखविल्यानंतर त्यांनी अभिमानाने “छत्रपती शिवाजी महाराज की जय” असा जयघोष केल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगातून नव्या पिढीमध्ये महाराजांविषयी आदर आणि अभिमान असल्याचे दिसून येते, असे त्यांनी म्हटले.
महाराजांचा सन्मान केवळ जयंती किंवा उत्सवापुरता मर्यादित न ठेवता तो दैनंदिन आचरणातूनही दिसला पाहिजे. तसेच घर, कार्यालय किंवा सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या महापुरुषांच्या जुन्या अथवा खराब झालेल्या प्रतिमांची सन्मानपूर्वक विल्हेवाट लावणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आजच्या युवा पिढीला मोबाईल आणि सोशल मीडियासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, शौर्य, त्याग, स्वराज्याची तळमळ, स्त्रीसन्मान आणि राष्ट्रप्रेमाचे संस्कार देणे ही काळाची गरज असल्याचे नमूद करत, सर्व नागरिकांनी महाराजांच्या विचारांचा, कार्याचा आणि प्रतिमेचा सदैव सन्मान करावा, असे आवाहन शाम पाटील यांनी केले.

Belgaum Varta Belgaum Varta