

बेळगाव : दिल्लीतील जंतरमंतर येथे पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी तसेच नीट परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांच्या निषेधार्थ बेळगावातील छत्रपती संभाजी चौकात विविध सामाजिक संघटनांनी बुधवारी निदर्शने केली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी लडाखमधील प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने लक्ष द्यावे, तसेच उपोषणाकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी केली. वांगचुक गेल्या १७ दिवसांपासून केवळ पाणी व मीठाच्या आधारावर उपोषण करत असल्याचे वक्त्यांनी सांगितले.
निदर्शनादरम्यान नीट परीक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटी, पेपरफुटीच्या घटना आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवरही तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी कठोर कायदेशीर सुधारणा करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी काही वक्त्यांनी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याचे आवाहन करण्यात आले.
हे आंदोलन जीवन विवेक प्रतिष्ठान, प्रगतीशील लेखक संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती (बेळगाव) आणि इतर सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये प्रा. आनंद मेणसे, नीला आपटे, ॲड. नितीन बोळबंदी, कॉम. नागेश सातेरी, डॉ. शिवाजी कागणीकर, ॲड. अमर येळ्ळूरकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले.

Belgaum Varta Belgaum Varta