

बेळगाव : भारतीय निवडणूक आयोगाने कर्नाटकसह दिल्ली, पंजाब आणि तेलंगणा या राज्यांमध्ये सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार एसआयआरअंतर्गत मतदार अर्जांचे वाटप आणि संकलन करण्याची अंतिम मुदत आता ८ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.
यासंदर्भात भारतीय निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. यापूर्वी ही प्रक्रिया २९ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, मतदार नोंदणी अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने आयोगाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार मसुदा मतदार यादी आता ५ ऑगस्टऐवजी १७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच अंतिम मतदार यादी पूर्वनियोजित ७ ऑक्टोबरऐवजी १९ ऑक्टोबर रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे.
दरम्यान, राज्यात एसआयआर मोहिमेला वेग आला असून आतापर्यंत ५.२७ कोटीहून अधिक अर्जांचे वितरण पूर्ण झाले आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के अर्ज वाटप पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. तसेच प्राप्त अर्जांपैकी १ कोटी ९९ लाख ५१ हजार ६३५ अर्जांचे, म्हणजेच सुमारे ६० टक्के अर्जांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले असून उर्वरित प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे.
मुदतवाढीमुळे अद्याप अर्ज भरू न शकलेल्या मतदारांना दिलासा मिळाला असून, पात्र नागरिकांनी ८ ऑगस्टपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करून मतदार यादीत नावाची नोंद अथवा दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta