

बेळगाव : हलगा-मच्छे बायपासच्या सुरू असलेल्या कामामुळे येळ्ळूर रस्ता बायपास परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने रविवारी भीषण अपघातांची मालिका घडली. निसरड्या झालेल्या रस्त्यावर सुमारे २५ ते ४० दुचाकी वाहने घसरून पडली, तर अनेक नागरिक जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, हलगा-मच्छे बायपास प्रकल्पाची वाहने येळ्ळूर रस्ता आणि गावातून ये-जा करत असल्याने रस्त्यावर मातीचा थर साचला आहे. यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीने या प्रकरणी संबंधित ठेकेदाराला तंबी देत वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर काही काळ खबरदारी घेण्यात आली होती. मात्र, रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता पुन्हा चिखलमय झाला.
संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत वडगावहून येळ्ळूरकडे जाणाऱ्या अनेक दुचाकी वाहनांचे संतुलन बिघडून अपघात झाले. वाहनांवरील महिला आणि लहान मुले चिखलात पडल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी तातडीने धाव घेत जखमी आणि नागरिकांना मदत केली. एका नागरिकाने आणलेला घरगुती बाजारही रस्त्यावर विखुरल्याची घटना घडली.
घटनांमुळे संतप्त झालेले शेकडो नागरिक घटनास्थळी जमा झाले. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी सोमवारी घटनास्थळी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने रस्ता स्वच्छ करून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta