

बेळगाव : विविध प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बीएसएनएल कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी गुरुवारी बेळगावात धरणे आंदोलन केले. दीर्घकाळापासून रखडलेल्या वेतनवाढ, पेन्शन दुरुस्ती आणि बीएसएनएलची ४जी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी गेल्या नऊ वर्षांपासून वेतनवाढ प्रलंबित असल्याने कर्मचारी आर्थिक अडचणींना सामोरे जात असल्याचे सांगितले. तसेच पेन्शनधारकांच्या प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक करून पेन्शनमध्ये आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणीही करण्यात आली.
कर्मचारी संघटनेचे नेते अरविंद चौगुले आणि रामू तटपटी यांनी सरकारने मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास येत्या ७ ऑगस्ट रोजी दिल्लीतील संसद भवनाला घेराव घालण्यात येईल, असा इशारा दिला.
खाजगी दूरसंचार कंपन्यांप्रमाणे बीएसएनएललाही अत्याधुनिक उपकरणे खरेदी करण्याची मुभा द्यावी, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील या दूरसंचार कंपनीला सक्षम करण्यासाठी आवश्यक आर्थिक व प्रशासकीय पाठबळ द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
या धरणे आंदोलनात बीएसएनएलचे कर्मचारी, अधिकारी आणि पेन्शनधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Belgaum Varta Belgaum Varta