

निपाणी (वार्ता) : दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्ज व अश्रुधुराचा वापर केल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी निपाणी व बेडकीहाळ ब्लॉक काँग्रेस ब्लॉक काँग्रेसतर्फे धर्मवीर संभाजी चौकात मानवी साखळीसह आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
आंदोलना दरम्यान जब-जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या दिल्ली पोलिसांचा धिक्कार असो, राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ हैं, जय भीम, आणि इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देत केंद्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र टीका केली.
यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी, देशाचे भविष्य घडविणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणे, अश्रुधुराच्या नळकांड्या सोडून त्यांना दडपण्याचा प्रयत्न करणे ही निंदनीय आणि लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दडपून सत्य लपवता येणार नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. त्या अधिकाराचे संरक्षण करण्याऐवजी विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यात काँग्रेस पक्ष ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी घेतलेली भूमिका ही देशातील तरुणांना न्याय मिळवून देणारी आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या न्याय्य संघर्षाला पाठिंबा देत असल्याचे सांगितले.
आंदोलनात काँग्रेसचे चिक्कोडी जिल्हा उपाध्यक्ष रोहन साळवे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, कर्नाटक महिला काँग्रेस जनरल सेक्रेटरी सुप्रिया पाटील, सुजय पाटील, पंच हमी कमिटी अध्यक्ष रमेश जाधव, अस्लम शिखलगार, लोकेश घस्ते, वर्षा चव्हाण, ॲड.एस एस चव्हाण, अण्णासाहेब हावले यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला, नागरिक सहभागी झाले होते.

Belgaum Varta Belgaum Varta