







जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे केवळ इमारती, पूल, रस्ते किंवा यंत्रे तयार करणारी व्यक्ती नव्हे. अभियंता म्हणजे समस्या ओळखून त्यावर योग्य, शाश्वत आणि नाविन्यपूर्ण उपाय शोधणारा व्यक्ती आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. घरापासून ते गगनचुंबी इमारतींपर्यंत, छोट्या यंत्रापासून ते आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत, रस्त्यांपासून ते अंतराळ संशोधनापर्यंत सर एम. विश्वेश्वरय्या यांनी आपल्या कार्यातून शिस्त, प्रामाणिकपणा, गुणवत्ता आणि देशसेवेचे आदर्श ठेवले आहे. तो आदर्श प्रत्येक अभियंत्याने जपण्याचे आवाहन निडसोशी येथील अभियंता जयश्री पाटील यांनी केले.
येथील असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स असोसिएशनतर्फे मंगळवारी (ता.१५) आयोजित अभियंता दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
पाटील म्हणाल्या, अभियंता होणे म्हणजे केवळ पदवी मिळवणे नाही, तर समाजाच्या प्रगतीमध्ये जबाबदारीने योगदान देणे आवश्यक आहे. सध्याच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, स्मार्ट सिटी, हरित ऊर्जा आणि आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये संधी आहेत. या बदलत्या जगात अभियंत्यांनी सतत नवीन ज्ञान आत्मसात करून नवीन कल्पना, नवीन तंत्रज्ञान आणि नवीन समाधान निर्माण करण्याचे आवाहन केले. प्रा. जी. बी. सांगोटे, हरीश मकाडिया, व्यंकटरमण रेड्डी, राहुल शिंदे, कपिल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
अजय माने यांनी स्वागत केले. असोसिएशनचे अध्यक्ष अमित रामनकट्टी यांनी प्रस्तावित केले. यावेळी खडकलाट येथील अभियंते रामचंद्र वराळे यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास धनंजय खराडे, अभियंते अनुप पाटील, अभिजीत जिरगे, राजेंद्र पणदे, दीपक माने, राजशेखर हिरेकुडी, गजानन वसेदार, सुरेश रायमाने, प्रमोद जाधव, सोमनाथ परमणे, काकासाहेब ऐनापुरे, अमर सुतार, मनोज पणदे, तौशिक बागवान, अमित तांदळे, नवीन बाडकर, अरमान बागवान, आदित्य पाटील, अमर सुतार, सुनील बल्लोळ, डॉ.अमर चौगुले, योगेश घाटगे यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. ओमकार वरुटे यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta