

बेळगावात आयोजकांचे उत्साहात स्वागत; संमेलनात बेळगावकर सहभागी होणार
बेळगाव : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने तामिळनाडूतील ऐतिहासिक तंजावर येथे २३ सप्टेंबर २०२६ रोजी राजे सरफोजीराजे भोसले (द्वितीय) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांचे बेळगावातील कॉलेज रोड येथील यश ॲटोच्या दालनात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. दक्षिण भारतातील हे पहिलेच मराठी साहित्य संमेलन असल्याने या उपक्रमाबद्दल साहित्यप्रेमींमध्ये विशेष उत्सुकता व्यक्त होत आहे.
स्वागत समारंभात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक – अध्यक्ष डॉ. शरद गोरे, युवराज संभाजीराजे भोसले, कवी किशोर टिळेकर आणि अजय साळुंखे यांचा परिषदेच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक प्रदेशाध्यक्ष रवींद्र पाटील होते. तंजावरचे युवराज संभाजीराजे भोसले यांनी बेळगाव व कर्नाटकातील मराठी बांधवांनी २३ सप्टेंबर रोजी तंजावर येथे होणाऱ्या ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा गौरव वाढवावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उद्योजक महादेव चौगुले यांनी प्रास्ताविक करून तंजावर साहित्य संमेलनाचे महत्त्व अधोरेखित केले. यश ऑटोचे संचालक शिवसंत संजय मोरे यांनी युवराज संभाजीराजे भोसले यांना स्मृतिचिन्ह व राजमुद्रा देऊन गौरव केला. एशियन मशिन ऑलिपिक गेम्स संघटना कर्नाटक राज्य अध्यक्ष पै. अतुल शिरोळे यांनी राजेंचा सत्कार संघटनेतर्फे करण्यात आला.
तसेच उद्योजक आप्पासाहेब गुरव आणि राजेंद्र मुतगेकर यांचा युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉ. शरद गोरे म्हणाले, “तंजावर ही दक्षिणेतील मराठी संस्कृतीची पंढरी आहे. राजे सरफोजीराजे भोसले यांच्या स्मृतीत मराठी साहित्य संमेलन होणे हा मराठी भाषा, संस्कृती आणि इतिहासाचा अभिमानास्पद क्षण आहे.”
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांनी तंजावर साहित्य संमेलनासाठी शुभेच्छा देताना सांगितले की, महाराष्ट्र आणि तंजावर यांच्यातील सांस्कृतिक नाते अधिक दृढ करणारा हा ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे. देशभरातील साहित्यिक, संशोधक, इतिहासप्रेमी आणि मराठीप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन राजे सरफोजीराजे भोसले (द्वितीय) यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करावा तसेच मराठी साहित्याचा झेंडा तंजावरच्या भूमीत अभिमानाने फडकवावा, असे आवाहन त्यांनी केले. बेळगावातूनही कार्यकर्ते आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परिषदेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावातून मोठा सहभाग नोंदविण्यात येणार असल्याची माहिती देत उपस्थितांचे आभार मानले.
या प्रसंगी मुख्याध्यापक एम. के. पाटील, रणजित चौगुले, संदीप तरळे, तानाजी पाटील, जिल्हाध्यक्षा अरुणा गोजे-पाटील, कवयित्री पूजा सुतार, स्मिता मेंडके, सविता वेसणे यांच्यासह बेळगाव जिल्हा साहित्य परिषद व शिवसंदेश भारत समूहाचे सदस्य, यश ॲटो परिवार व साहित्यप्रेमी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दक्षिण भारतातील पहिले मराठी साहित्य संमेलन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक उपक्रमाततून राजे सरफोजीराजे भोसले यांच्या कार्याचा गौरव आणि मराठी भाषेच्या सांस्कृतिक वारशाचा जागर देशभरात घडणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Belgaum Varta Belgaum Varta