

शेतकऱ्यांना दिलासा; हिडकलमध्येही पाण्याची आवक वाढली
बेळगाव : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होत असून, जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता अवघ्या आठ फूट पाण्याचीच आवश्यकता उरली आहे. पावसाचा सध्याचा वेग कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत जलाशय तुडुंब भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
बुधवारी राकसकोप जलाशयाची पाणीपातळी 2,246.7 फूट इतकी नोंदविण्यात आली. यंदाच्या पावसाळ्यात जलाशय परिसरात आतापर्यंत 1,128 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच दिवशी जलाशयातील पाणीपातळी 2,474 फूट इतकी होती. त्यामुळे यंदाही पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी आठ फूट पाण्याची गरज आहे.
दरम्यान, हिडकल जलाशयालाही अद्याप 24 टीएमसी पाण्याची आवश्यकता असून सध्या जलाशयात 11,749 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्याने हिडकलच्या पाणीसाठ्यातही सातत्याने वाढ होत आहे.
संततधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. काही सखल भागांत पाणी साचल्याचे चित्र दिसून येत असले, तरी हा पाऊस शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरला आहे. मागील आठवड्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतशिवारात पुन्हा चैतन्य निर्माण झाले असून, जलाशयांतील पाणीसाठाही वाढू लागल्याने शहराच्या पाणीपुरवठ्याबाबतचा दिलासाही वाढला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta