


बेळगाव : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले असले, तरी त्याचा अर्थ ते सक्रिय राजकारणातून निवृत्त होत आहेत असा अजिबात नाही, असे नगरविकास मंत्री यतींद्र सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.
बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सिद्धरामय्या यांनी पुढील निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले असले, तरी ते सक्रिय राजकारणात राहून दुर्बल व वंचित घटकांच्या हक्कासाठी आवाज उठवत राहतील. तसेच आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारात ते सक्रिय सहभाग घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारले असता, पक्षाच्या नेतृत्वाने मुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावले असून चर्चेनंतर योग्य निर्णय घेऊन मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
बेळगाव दौऱ्याचा उद्देश नगरविकास विभागाच्या कामांचा आढावा घेणे असल्याचे सांगत त्यांनी महापालिका आणि शहरातील विविध विकासकामांबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे सांगितले.
बेळगाव महापालिकेसाठी मुख्यमंत्र्यांचे विशेष अनुदान स्थगित झाल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर, याबाबत संपूर्ण माहिती नसून ती तपासून घेईन, असे त्यांनी सांगितले. निवडून आलेले प्रतिनिधी नसलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनाही केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एल अँड टी कंपनीने रस्ते खोदून नागरिकांना त्रास दिल्याबाबत प्रतिक्रिया देताना, २४x७ पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू असून ज्या ठिकाणी रस्ते खोदले आहेत, तेथे संबंधित कंपनीनेच योग्य प्रकारे दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
बेळगाव जिल्ह्यासाठी विशेष विकास योजनांबाबत बोलताना, जिल्ह्याच्या गरजांचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक विकासकामे निश्चित केली जातील आणि राज्य सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मंत्री यतींद्र सिद्धरामय्या यांनी सांगितले.

Belgaum Varta Belgaum Varta