


नवी दिल्ली/बेळगाव : बेळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बेळगाव बायपास प्रकल्पातील पॅकेज-1 चे काम पॅकेज-2 आणि 3 ची प्रतीक्षा न करता तातडीने सुरू करण्याची मागणी खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे सचिव उमाशंकर यांच्याकडे केली.
बुधवारी झालेल्या बैठकीत शेट्टर यांनी सांगितले की, पॅकेज-2 आणि 3 मधील विलंबामुळे संपूर्ण बायपास प्रकल्प रखडला असून त्याचा फटका बेळगाव शहरातील वाहतुकीला बसत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) पॅकेज-1 साठी स्वतंत्रपणे निविदा प्रक्रिया राबवून कामाला तातडीने सुरुवात करावी, अशी त्यांनी मागणी केली.
यावेळी त्यांनी बेळगाव–हुनगुंद–रायचूर राष्ट्रीय महामार्गालगत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही निदर्शनास आणून दिले. या मार्गावर आवश्यक ठिकाणी सर्व्हिस रोडची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.
यावर सचिव उमाशंकर यांनी दोन्ही मुद्द्यांची सखोल तपासणी करून शक्य तितक्या लवकर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. बेळगाव बायपास प्रकल्पाला गती मिळाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Belgaum Varta Belgaum Varta