


बेळगाव : साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसू लागला आहे. किरकोळ बाजारात साखरेचा दर प्रतिकिलो ४९ ते ५२ रुपये इतका झाला असून, अवघ्या पंधरा दिवसांत सातत्याने दरवाढ झाल्याने दैनंदिन वापरातील चहासह गोड पदार्थही महागले आहेत. त्यामुळे महिन्याचे घरगुती बजेट कोलमडण्याची चिन्हे दिसत आहेत.
व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, घाऊक बाजारात साखरेचा दर प्रतिक्विंटल ४,८०० ते ४,९०० रुपये इतका झाला आहे. महिनाभरात प्रतिक्विंटल साखरेच्या दरात सुमारे ४०० ते ५०० रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीचा थेट परिणाम किरकोळ बाजारातील दरांवर झाला असून ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
साखरेच्या दरवाढीचा परिणाम गुळावरही झाला आहे. सध्या गुळाचा दर ४८ ते ५० रुपये प्रतिकिलो इतका झाला असून, साखरेप्रमाणेच गुळाच्या किमतीतही वाढ झाली आहे.
श्रावण महिना हा सण-समारंभ आणि गोडधोड पदार्थांचा महिना मानला जातो. या काळात घराघरांत विविध गोड पदार्थ तयार केले जात असल्याने साखर आणि गुळाची मागणी वाढते. मात्र यंदा वाढलेल्या दरांमुळे सणांचा गोडवा महाग ठरणार असल्याचे चित्र आहे.
किराणा व्यापाऱ्यांच्या मते, आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर साखर, गूळ आणि तांदळाच्या दरात फारशी घट होण्याची शक्यता नसून पुढील काही महिने हेच दर कायम राहू शकतात. त्यामुळे महागाईचा आणखी भार सर्वसामान्य ग्राहकांवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Belgaum Varta Belgaum Varta