


बेळगाव : बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी नवी दिल्लीत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजारापू यांची भेट घेऊन बेळगाव–बंगळुरू आणि बेळगाव–नवी दिल्ली या मार्गांवरील इंडिगोची दैनंदिन विमानसेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली.
शेट्टर यांनी मंत्र्यांना सांगितले की, १६ जून २०२६ पासून इंडिगोने बेळगाव–बंगळुरू मार्गावरील विमानसेवा आठवड्यातील निवडक दिवसांपुरती मर्यादित केली आहे. तसेच बेळगाव–नवी दिल्ली विमानसेवाही केवळ सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवसांपुरती सुरू असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे दोन्ही मार्गांवर पुन्हा दररोज विमानसेवा सुरू करण्यासाठी इंडिगोला निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी शेट्टर यांनी बेळगाव विमानतळाचा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून दर्जा वाढविण्याची मागणीही केली. तसेच वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून चेन्नई, पुणे आणि अहमदाबाद या शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची विनंती त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली.
यावर केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू किंजारापू यांनी या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून जनतेच्या हितासाठी बेळगावची हवाई संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले.

Belgaum Varta Belgaum Varta