


बेळगाव : “संस्कार, शिक्षण आणि शिकवण या तीन गोष्टी जीवनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. संस्कारासाठी सत्संगाची आवश्यकता असून, गुरुचे मार्गदर्शन लाभल्यावरच जीवनाची खरी प्रगती होते. गुरूला शरण जाणे म्हणजेच खरी गुरुपौर्णिमा होय,” असे प्रतिपादन जीवनविद्या मिशनच्या बेळगाव शाखेचे प्रमुख भाई शंकरराव बांधकर यांनी केले.
जीवनविद्या मिशनच्या शास्त्रीनगर उपकेंद्राच्या वतीने मंगळवारी शास्त्रीनगर येथील अनिल लक्ष्मण देसाई यांच्या निवासस्थानी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाई शंकरराव बांधकर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले, “सद्गुरू वामनराव पै यांनी जीवनविद्या मिशनची स्थापना करून ‘जीवन कसे जगावे’ याचा मार्ग समाजाला दाखवला. सर्व जग सुखी व्हावे, या ध्येयाने त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजप्रबोधनासाठी समर्पित केले. त्यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन लाखो नामधारकांनी आपल्या जीवनात यश संपादन केले आहे.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी सौ. शैलजा शिरोडकर यांनी प्रास्ताविक केले. अनिल देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर सामूहिक विश्वप्रार्थना करण्यात आली. उपकेंद्रप्रमुख शैलेश शिरोडकर यांनी आभार मानले.
यावेळी नामधारकांसह अनंत लाड, अनंत पाटील, सुभाष देसाई, व्ही. के. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta