

बेळगाव : के.एल.ई. संस्थेच्या लिंगराज कला व वाणिज्य पदवी तसेच पदवीपूर्व महाविद्यालयाच्या हिंदी विभागातर्फे हिंदी साहित्यातील महान कथाकार व कादंबरीकार मुन्शी प्रेमचंद यांच्या १४६ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून देळे (काणकोण-गोवा) येथील श्री. मल्लिकार्जुन व श्री. चेतन मंजू देसाई महाविद्यालयाच्या उपप्राचार्या व हिंदी विभागाच्या प्रमुख डॉ. रुपा च्यारी यांनी मार्गदर्शन केले. “प्रेमचंद हे जनसामान्यांचे लोकप्रिय साहित्यकार असून त्यांच्या साहित्यामधून मानवी संवेदना, नैतिक मूल्ये आणि सामाजिक जबाबदारीचा प्रभावी संदेश दिला आहे,” असे त्या म्हणाल्या. त्यांनी गोदान, गबन, निर्मला, सेवासदन या कादंबऱ्यांसह ईदगाह, कफन, पूस की रात, मंत्र आणि बूढी काकी यांसारख्या कथांचा उल्लेख केला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रेमचंद यांच्या ‘मंत्र’ या कथेवर आधारित नाटिका, रोपट्याला पाणी घालणे, प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करून झाली. तसेच प्रेमचंद यांच्या जीवनावरील भित्तीपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिंगराज पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती गिरिजा हिरेमठ होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांनी प्रेमचंद यांच्या साहित्याचा अभ्यास करून सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये आणि मानवतावादी दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन केले.
यावेळी आदिती कुट्रे, समीपता जत्राटी आणि स्वरा पाटील यांनी प्रेमचंद यांच्या कथांचे सादरीकरण केले. व्यासपीठावर डॉ. कलावती निंबाळकर, प्रा. सीमा जनवाडे, प्रा. सूरज हत्तलगी, प्रा. शोभा गणाचारी, हिंदी विभागप्रमुख प्रा. अर्जुन कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. फैजीन किल्लेदार व कु. दीपिका राठोड यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय कु. नक्षत्रा कुलकर्णी यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन कु. सारिका पाटील यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. शशिकांत कोन्नूर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हिंदी विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta