
कंग्राळी खुर्द हद्दीत पूजेचे साहित्य, प्लास्टिक व ओला-सुका कचरा नदीत; कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी
बेळगाव : धार्मिक श्रद्धा जपत असताना पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही नागरिकांनी ओळखण्याची गरज निर्माण झाली आहे. कंग्राळी खुर्द गावाच्या हद्दीत मार्कंडेय नदीकाठासह नदीवरील पुलाजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून, पूजेचे साहित्य, फळे-फुले, नैवेद्य, प्लास्टिकच्या पिशव्या तसेच ओला-सुका कचरा थेट नदीकाठावर आणि नदीपात्रात टाकला जात आहे. त्यामुळे परिसराच्या स्वच्छतेबरोबरच नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पूजेचे साहित्य स्वतंत्रपणे टाकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असून, इतर कचऱ्यासाठी कचराकुंड्याही उपलब्ध आहेत. मात्र, या सुविधांकडे दुर्लक्ष करून रस्त्याच्या दुतर्फा, नदीकाठावर आणि थेट नदीमध्ये कचरा टाकण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडण्यासोबतच जलस्रोतांचे पावित्र्य आणि पर्यावरणीय आरोग्य धोक्यात आले आहे.
धार्मिक विधी पार पाडताना परिसर स्वच्छ ठेवणे हीदेखील प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे. पूजेच्या साहित्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि नदी-तलावांसारख्या जलस्रोतांमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा न टाकणे आवश्यक आहे.
मार्कंडेय नदीकाठावरील वाढत्या कचऱ्याच्या समस्येकडे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन नियमित स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच नदी, तलाव आणि इतर जलस्रोतांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांतून होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta