
बेळगाव : केंद्र सरकारकडून गेल्या आठ महिन्यांत इंधनाच्या किमतीत वाढ करण्यात आली असतानाही राज्यातील बस तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे केएसआरटीसीसह राज्यातील चारही परिवहन निगमला हजारो कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर बस तिकीट दरवाढीचा विचार सुरू असून, प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, याची दक्षता घेऊनच दरवाढ केली जाईल, असे परिवहन मंत्री सुरेश यांनी सांगितले.
निवृत्त आयएएस अधिकारी अतुल तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेली समिती बस तिकीट दरवाढीबाबत अभ्यास करत आहे. समितीकडून लवकरच शासनाला अहवाल सादर केला जाणार आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून तिकीट दरात किरकोळ वाढ करण्याचा प्रस्ताव असून, सर्वसामान्य प्रवाशांवर त्याचा मोठा आर्थिक भार पडणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. तसेच हा भार कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून मदत करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘शक्ती’ योजनेअंतर्गत महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा दिली जात आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात एक कोटीहून अधिक महिलांना मोफत स्मार्ट कार्ड वितरित करण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे २५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. स्मार्ट कार्ड वितरणाची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.

Belgaum Varta Belgaum Varta