
रामतीर्थ नगरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; तीन किलो चांदीसह ५० हजारांची रोकड चोरी
बेळगाव : रामतीर्थ नगर येथे बंद घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी सुमारे सहा लाख रुपयांहून अधिक किमतीचे चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, वाढत्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रामतीर्थ नगर येथील कंत्राटदार परशुराम पवार यांच्या घरात ही चोरी झाली. पवार हे ३१ ऑगस्ट रोजी घराला कुलूप लावून कुटुंबीयांसह गावी गेले होते. रविवारी ते बेळगावला परतल्यानंतर घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सुमारे तीन किलो चांदीचे दागिने आणि ५० हजार रुपये रोख असा सहा लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
माळमारुती पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक श्रीशैल हुलगेरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
शहर व परिसरात वाढत असलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे पोलिसांसमोर चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. बंद घरे हेरून चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta