
पंत बाळेकुंद्री येथे बेळगाव-बागलकोट महामार्गावर वाहतूक खोळंबली
बेळगाव : सतत खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा तसेच गणेशोत्सव मंडळांवर लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात, या मागण्यांसाठी बेळगाव ग्रामीण भाजप आणि शेतकऱ्यांच्या वतीने पंत बाळेकुंद्री येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
अनियमित वीजपुरवठ्यामुळे विद्यार्थी, गृहिणी आणि शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवसभरात तब्बल ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याने शेतीला पाणी देणे कठीण झाले आहे. त्याचबरोबर गणेशोत्सव मंडळांना वीज जोडणीसाठी तब्बल २२ हजार रुपये भरण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
या मागण्यांसाठी पंत बाळेकुंद्री येथील वीज केंद्रासमोर भाजप कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी निदर्शने केली. आंदोलनामुळे बेळगाव-बागलकोट राज्य महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. मारिहाळ पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
माजी आमदार संजय पाटील, भाजप ग्रामीण मंडळ अध्यक्ष युवराज जाधव, माजी अध्यक्ष धनंजय जाधव आणि यल्लेश कोलकार यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. “शेतकऱ्यांच्या पिकांसाठी आवश्यक तेवढा वीजपुरवठा उपलब्ध करून देणे हे सरकारचे कर्तव्य आहे,” असे माजी आमदार संजय पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, आंदोलनाची दखल घेत हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. वीजपुरवठा सुरळीत करण्यासह अन्य समस्या सोडविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Belgaum Varta Belgaum Varta