







बेळगाव : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…’च्या जयघोषात दीड दिवसांच्या गणरायाला मंगळवारी सायंकाळी भक्तिभावाने निरोप देण्यात आला. परंपरेनुसार दरवर्षी दीड दिवसांनी गणरायाचे विसर्जन केले जाते. त्यानुसार विधिवत पूजा-अर्चा व आरती करून भाविकांनी मोठ्या उत्साहात बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले.
बुद्धीची देवता, विघ्नहर्ता आणि मांगल्याचा दाता असलेल्या गणरायाचे सोमवारी घरोघरी मोठ्या भक्तिभावाने आगमन झाले. विधिवत पूजा-अर्चा आणि आरतीनंतर गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वाला सुरुवात झाली. मात्र धार्मिक प्रथेनुसार अनेक घरांतील गणरायाचे दीड दिवसांनी विसर्जन करण्यात येते. त्यानुसार मंगळवार दुपारपासून कपिलेश्वर विसर्जन तलावात गणेशमूर्ती विसर्जनास सुरुवात झाली.
दीड दिवसांच्या गणरायाच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून कपिलेश्वर तलाव परिसरात आवश्यक तयारी करण्यात आली होती. त्यामुळे विसर्जनाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. भाविकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करत बाप्पाला निरोप दिला.
गणरायाच्या आगमनावेळी जसा उत्साह आणि भक्तिभाव पाहायला मिळाला, त्याच उत्साहात अनेक मंडळे व कुटुंबांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात मिरवणूक काढून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ या जयघोषाने विसर्जनस्थळाचा परिसर दुमदुमून गेला.

Belgaum Varta Belgaum Varta